तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या; सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांचे निर्देश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी आणि साधला संवाद;

 सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा, देवखेड, सायंदेव, वर्दडी या अतिवृष्टीग्रस्त भागांची केली पाहणी...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सिंदखेडराजा तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे, शाळांचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी दिले.
अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी दरम्यान त्यांच्या सोबत आमदार मनोज कायंदे, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार विजयराज शिंदे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, तहसीलदार अजित दिवटे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री ना. सावकारे यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा, देवखेड, सायंदेव, वर्दडी या गावांना भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीबाबतची माहिती घेतली. यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामे करून स्थानिक स्तरावर मदत देण्याचे आणि शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.तसेच यापूर्वी झालेल्या अवेळी पावसामुळे व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या भरपाईचे निधी तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावेत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सहपालकमंत्री पूढे म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. 

पात्रशेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळेल, यांची दक्षता प्रशासनाने घ्यावी.

दरम्यान, सहपालकमंत्र्यांनी लोणार सरोवराचीही पाहणी करून पर्यटकांसाठी सुविधा वाढवण्यासंबंधी सूचना दिल्या आणि पर्यटनविकासासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.यावेळी उपवनसंरक्षक सरोज गवस, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, तहसीलदार भूषण पाटील उपस्थित होते.