शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! शेती नावावर करण्याचा खर्च कमी; सलोखा योजनेला २०२७ पर्यंत मुदतवाढ; शेतजमिनीच्या वादांना मिळणार कायमचा निकाल!
Apr 14, 2025, 08:09 IST
बुलढाणा ( जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेतजमिनीवरील ताबा आणि मालकी हक्काशी संबंधित वाद मिटवण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सलोखा योजनेला आता १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
योजनेअंतर्गत काय सवलती?
सलोखा योजनेत १२ वर्षांहून अधिक काळ एकमेकांच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपापल्या नावावर जमीन घेण्यासाठी फक्त १००० रुपये मुद्रांक शुल्क आणि १००० रुपये नोंदणी फी भरावी लागणार आहे.
सलोखा योजनेचे मुख्य फायदे:
१.शेतजमीनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतकऱ्याची जमीन अदलाबदलीनंतर क्षेत्र ज्याचे त्याचे नावे होतील.
२.शेतजमीनीचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, पाईपलाईन, वृक्ष व फळबाग लागवडीबाबत शासनाच्या विविध योजनांचा फायदा होऊ शकणार आहे.
३.शेतकऱ्यांचे आपआपसातील वादामुळे अनेक शेतजमीन पडीक राहतात. वाद मिटल्यास शेतजमिनीच्या लागवडीखालील व वहितीखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल.
४.सलोखा योजनेच्या माध्यमातून परस्परविरोधी ताब्याबाबत असलेली विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली निघणार आहेत.
ही योजना शेतजमिनीच्या मालकी व ताब्याशी संबंधित वाद मिटवण्यासाठी प्रभावी उपाय ठरणार असून, अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे..