आणीबाणीत संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या जतनासाठी सेनानींचे मोलाचे योगदान! जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे प्रतिपादन!
आणीबाणी लढ्यातील गौरवमूर्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान! चित्रप्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
Jun 25, 2025, 17:33 IST
बुलढाणा (जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आणीबाणी काळात भारतीय संविधान आणि लोकशाहीची मूल्ये कायमस्वरूपी जतन करण्यासाठी लोकशाही लढ्यातील बंदिवास भोगलेल्या सेनानींचे मोलाचे योगदान राहिले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले.
देशातील १९७५ साली झालेल्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील बंदिवास सोसलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. त्यावेळी संबोधित करतांना डॉ. पाटील बोलत होते. यावेळी प्रशासकीय इमारतीत आयोजित आणीबाणी काळातील घडामोडींवर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, प्र.जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, तहसिलदार विठ्ठल कुमरे, नायब तहसिलदार विजय पाटील, माजी नगराध्यक्ष सेनानी गोकूळ शर्मा, नेमिनाथ सातपुते, रामदास बिडकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. किरण पाटील पुढे म्हणाले, "आणीबाणी लढ्यातील व्यक्तींनी भारतीय संविधान आणि लोकशाहीची मूल्ये भविष्यातही कायमस्वरूपी जतन ठेवण्याचा संदेश पुढच्या भावी पिढीपर्यंत निरंतरपणे पोहोचवावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
देशात दि. २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान व यथोचित गौरव करण्याच्या व आणीबाणी संदर्भात प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना केंद्र व राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात आणीबाणी काळात बुलढाणा जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी बंदिवास भोगला त्यांना व त्यांच्या पश्चात पत्नीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देवून यथोचित गौरविण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील आणीबाणी लढ्यातील सुमारे २५० सेनानी सहभागी झाले होते, त्यांना जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चित्रप्रदर्शनाला भेट देवून पाहणी केली. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.