आदिवासी बांधवांचे पुनर्वसन व्हावे यासाठी आमरण उपोषणास सुरुवात; माळेगाव व मोहेगाव येथील निष्कासित कुटुंबांचे पुन्हा पुनर्वसन करण्याची मागणी
Jun 17, 2025, 20:01 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मोताळा तालुक्यातील माळेगाव आणि मोहेगाव येथील आदिवासी बांधवांच्या पुनर्वसनाची मागणी करत आम्रपाल वाघमारे यांनी १६ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
मोहेगाव व माळेगाव परिसरातील आदिवासी बांधव 1998 पासून वन जमिनीवर शेती करून आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. शेतीच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतानाच वनविभागाने अचानक नोटीस बजावून अवघ्या तीन दिवसांत कोणतेही उत्तर न ऐकता पोलीस बंदोबस्तात आदिवासींच्या घरांचे व शेतीचे निष्कासन केले. यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
निसर्गावर आधारित जीवन जगणाऱ्या या आदिवासी बांधवांचे जीवन उद्ध्वस्त झाले असून, त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे निष्कासित आदिवासी बांधवांना मूळ ठिकाणीच पुनर्वसित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ही मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा आम्रपाल वाघमारे यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाला सामाजिक संघटनांचाही पाठींबा मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वत्र होत आहे.