सोलर पंपाचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांनी चिंता करू नये; महावितरणकडून त्वरित दुरुस्तीची सुविधा! अशी करा तक्रार.....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)शेतीसाठी पाणी हा अत्यावश्यक घटक आहे. पारंपरिक वीजपुरवठ्याच्या मर्यादा लक्षात घेता राज्य शासनाने सौर कृषी पंप योजना सुरू केली आणि या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. मात्र अलीकडील वादळवाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी सोलर पॅनेल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
मात्र आता घाबरण्याची गरज नाही. महावितरणने या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांना घरी बसूनच फोन किंवा ऑनलाईन माध्यमातून तक्रार करता येणार आहे. यासाठीची कार्यपद्धती सुलभ असून महावितरणने तीन दिवसात तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक केले आहे.
राज्यात आतापर्यंत ५ लाख ६५ हजारांहून अधिक सौर कृषी पंप बसविण्यात आले असून महाराष्ट्र देशात या बाबतीत आघाडीवर आहे. पुढील टप्प्यात आणखी पाच लाख सौर पंप बसविण्याचे नियोजन आहे.
मे महिन्याच्या अखेरीस आलेल्या वादळवाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी सौर ऊर्जा पॅनेल्स उध्वस्त झाले आहेत. सोलर पंप न चालणे, पॅनेल्सचे नुकसान होणे, सौर संच कार्यरत नसणे, पंप चोरीला जाणे किंवा कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी महावितरणकडे नोंदविता येणार आहेत.
तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांकडे सौर पंपाचा लाभार्थी क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा आपला जिल्हा, तालुका, गाव व नाव इतकी माहिती असणे पुरेसे आहे.
शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे तक्रार नोंदवावी –
१. महावितरण टोल फ्री क्रमांक : १८००-२३३-३४३५ / १८००-२१२-३४३५
२. महावितरणची सौर कृषी पंप योजना संकेतस्थळ : [https://www.mahadiscom.in/solar\_MTSKPY](https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY)
३. संबंधित पुरवठादार कंपनीच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदणी (सर्व कंपन्यांच्या लिंक महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध)
सौर कृषी पंप बसविल्यानंतर पुढील पाच वर्षे त्याच्या देखभालीची जबाबदारी पुरवठादार कंपनीची असून शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर तीन दिवसांत ती सोडवणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाईलवर संदेश पाठवण्यात येईल.
महावितरणच्या प्रत्येक मंडलाचे अधीक्षक अभियंता कंत्राटदारांच्या कामावर लक्ष ठेवणार असून प्रत्येक जिल्ह्यात सेवा केंद्र सुरू करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.या सुविधेमुळे सौर पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा विश्वास वाढणार असून सौर ऊर्जेचा लाभ अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे.