अंचरवाडीच्या शेतकऱ्यांचे आज जलसमाधी आंदोलन! नदीला मोठा पूर; पोलिसांचा रात्रीपासून बंदोबस्त..; पुलाअभावी शेतकऱ्यांना भोगाव्या लागत आहेत नरकयातना...

 
अंचरवाडी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रस्त्यात असलेल्या नदीवर पूल नसल्याने अंचरवाडी येथील शेतकऱ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. एकदा ही समस्या कायमची सोडवा,नाहीतर आम्हाला मरु द्या असे म्हणत शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज,२ सप्टेंबरला जवळपास २०० शेतकरी नदीपात्रात व काही धरण परिसरात जलसमाधी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे काही अघटीत होऊ नये यासाठी मुसळधार पावसात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला असून यंत्रणेच्या वतीने आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अंचरवाडी भरोसा रस्त्यावरील नदीवर पुल नाही. ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी याचा वारंवार पाठपुरावा केला, मात्र यंत्रणेने दखल घेतली नाही. जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना या नदीपात्रातून वाट काढावी लागते. नदीला पूर असल्यास नदीपात्राच्या पलिकडील शेतकऱ्यांची जनावरे ४–५ दिवस उपाशी राहतात. शेतकऱ्यांना वेळेवर पिकांची मशागत करता येत नाही, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही समस्या निकाली निघावी यासाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा चिखली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला होता..
अधिकारी म्हणतात फंड नाही..
दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला . संध्या फंड उपलब्ध नाही, जेव्हा फंड उपलब्ध होईल तेव्हा काम करू असे उत्तर यंत्रणेकडून देण्यात आले. मात्र शेतकऱ्यांचे या उत्तराने समाधान झाले नाही. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत जो निधी वापरल्या जातो, त्यातून हे काम तातडीने मार्गी लावावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे..