शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या !कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य; जिल्हा कृषी अधिकारी म्हणतात....

 
 बुलढाणा (जिमाका) : केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी 15 एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात 5 लक्ष 72 हजार 128 खातेदार असून त्यापैकी 3 लक्ष 50 हजार 307 शेतकऱ्यांनी (61.23 टक्के) नोंदणी केली आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवून घेतले नाही त्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करुन शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बनवून कृषी योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकूण खातेदारांपैकी 4 लक्ष 34 हजार 468 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थी आहेत. त्यापैकी 2 लक्ष 73 हजार 234 खातेदारांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढले असून त्याची टक्केवारी 62.89 इतकी आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जसे कि, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, नमो शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, नानाजी देशमुख कृषि संजीवनी, महाडीबीटी, मदत व पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्ती करिता देण्यात येणारी मदत याकरिता दि. 15 एप्रिल, 2025 च्या शासन निर्णयानुसार अनिवार्य करण्यात आले आहे. अद्याप जिल्ह्यात 2 लक्ष 21 हजार 821 शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बनवून घेतलेले नाहीत. असे शेतकरी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व कृषि सहाय्यक यांना संपर्क साधून जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बनवून कृषी व ईतर संलग्न विभागामार्फत योजनांचा लाभ घ्यावा. याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण निर्माण झाल्यास आपल्या तहसील किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा. आपल्या नजीकचे सी.एस.सी.केंद्र शोधण्यासाठी शेतकऱ्यांनी https://locator.csccloud.in लिंकचा वापर करावा.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विविध शासकिय योजनांचा लाभ व शासकीय मदत घेण्यासाठी शासन निर्णयानुसार शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आला असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढला नसेल त्यांनी आजच नजीकच्या सी.एस.सी केंद्रावर जावून आपले नावाची नोंदणी करून शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.