फडणवीस म्हणतात सातबारा कोरा, अजित पवार म्हणतात पैसे भरा! शेतकऱ्यांनी करायचे काय? शेतकऱ्यांचा सवाल! चिखलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेची जिल्हा बँकेसमोर घोषणाबाजी...
Apr 1, 2025, 09:30 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले सातबारा कोरा करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे फर्मान काढल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चिखली येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन केले. सातबारा कोरा झाल्याशिवाय एकही पैसा भरणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विनायक सरनाईक, नितीन राजपूत, संतोष शेळके, रमेश कुटे, ज्ञानेश्वर मोरे, गजानन वाघ, राजेंद्र इंगळे, भागवत वाघ, नागोराव लांबे, संदीप वाघ यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले, की निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन
सरकारने विसरू नये. अजित पवार कितीही ओरडले, तरी शेतकरी एक रुपयाही भरणार नाही. सरकारने सातबारा कोरा केल्याशिवाय शेतकऱ्यांचा संघर्ष थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.