पिकविम्याचे पैसे व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत :माजी मंत्री सुबोध सावजी !
सावजी यांनी पत्रात स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांनी संघर्ष करून पिकविमा मिळवला आहे. केवळ राजकीय नेत्यांच्या भेटींमुळे विमा मिळतो असे सांगणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत, तर तो अन्यायच ठरतो.”
सरकारी पिकविम्याची रक्कम वेळेवर न मिळाल्यास संबंधित विमा कंपन्यांवर कारवाई करून एफआयआर दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. “खाजगी विमा कंपन्या मुदत संपताच पैसे देतात, मग शासनामार्फत घेतलेला पिकविमा वेळेवर का मिळत नाही? उशिराने मिळालेल्या रकमेस व्याज मिळाले पाहिजे,” असे सावजी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या तुलनेत शासनातील अधिकारी-कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि लोकप्रतिनिधींना पगार व निवृत्तीवेतन वेळेवर मिळते, हे वास्तव अधोरेखित करून सावजी यांनी संताप व्यक्त केला.
“आपण स्वतः शेतकरी आहात, असे अभिमानाने सांगता. मग याच अभिमानाने आगामी अधिवेशनात पिकविमा मुदत संपताच वितरित व्हावा, तसेच उशिराने मिळणाऱ्या विम्याचे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे, यासाठी ठोस पावले उचलावीत,” अशी अपेक्षा सावजी यांनी आपल्या पत्राद्वारे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे व्यक्त केली.