विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शिक्षकांच्या निलंबनाचा पुनर्विचार करा – ॲड. जयश्री शळके यांची मागणी!शिवसेनेचं जिल्हा प्रशासनाला निवेदन; शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता...
Jun 17, 2025, 20:14 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या १० पेक्षा कमी असल्याचे कारण देत ३५ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता ही कारवाई अन्यायकारक असून तिचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शळके यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, नांदुरा आणि मोताळा तालुक्यातील एकूण २० शाळांमध्ये पटसंख्या कमी असल्याने संबंधित शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या घटण्यामागे सामाजिक, शैक्षणिक व भौगोलिक कारणे असून केवळ शिक्षकांनाच दोषी धरून कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद शाळांची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून, शिक्षकांच्या कमतरतेपासून इमारतींच्या सुविधेपर्यंत अनेक समस्या आहेत. काही शाळांमध्ये वर्ग खोल्या, स्वच्छतागृह, पाणी पुरवठा अशा मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत. शासनाच्या उदासीन धोरणामुळेच आज अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.
शिवाय इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे व रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील कुटुंबांचे स्थलांतर शहरांकडे होत असल्याने गावांतील पटसंख्या घटली आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करणं योग्य नसून, त्यांनी आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी शळके यांनी केली.
या निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाने यामागची सामाजिक परिस्थिती समजून घेत योग्य निर्णय घ्यावा, सरसकट निलंबन न करता आवश्यकतेनुसार शाळांची कार्यपद्धती तपासून कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मो. सोफियान, रफिक शेठ, शहराध्यक्ष अनिकेत गवळी यांची उपस्थिती होती.