बकरी ईद सौहार्दात साजरी करा ! जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; जनावरांच्या वाहतुकीसाठी आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक; गोवंश तस्करी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज....
प्रशासनाची खबरदारी आणि सूचना :
बकरी ईदच्या काळात जनावरांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. यासाठी पशुसंवर्धन विभागाने आरोग्य तपासणी करून अधिकृत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी टाळण्यासाठी पोलीस आणि पशुसंवर्धन विभागाने सामूहिक समन्वय ठेवावा.
प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा व गोवंश हत्याबंदी कायदा यांची कडक अंमलबजावणी केली जाणार असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
ग्रामीण व शहरी भागातील विद्युत पुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश वीज वितरण विभागाला देण्यात आले आहेत.बाजारपेठ, कत्तलखाने व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेसाठी नगरपरिषद व संबंधित यंत्रणांनी तयारी ठेवावी.
सोशल मीडियावरील अफवांना आळा :
सणाच्या काळात समाजकंठकांकडून धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियावर पसरवले जातात, याबाबत नागरिकांनी सावध राहावे. अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि पोलीस विभागास तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की, सणाच्या दिवशी कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी शहर व गावांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.कोणतीही अवैध वाहतूक, कत्तल अथवा कायद्याचे उल्लंघन झाल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. धर्मगुरूंनी आणि समाज बांधवांनी शांततेसाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शांतता समितीच्या या बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनीही सण शांततेत व सौहार्दात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.