अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, अॅप आणि शिबिरांची योजना – मंत्री प्रकाश आबिटकर
Apr 19, 2025, 13:38 IST
मुंबई( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रुग्णांना वेळेवर, दर्जेदार व कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी कठोर पावले उचलण्यात येत असून गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
वरळी येथील राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्यांनी आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध निर्णय घेतले. अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून ४१८० वर नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाखापर्यंतचे कॅशलेस उपचार देण्याचे निर्देशही देण्यात आले.
प्रत्येक रुग्णालयाने मासिक आरोग्य शिबिरे घेऊन किमान ५ रुग्णांवर मोफत उपचार करावेत, योजनेसाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करावे, जिल्हास्तरावर समित्या स्थापन कराव्यात व आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेला गती द्यावी असे आदेशही त्यांनी दिले.
सुमारे १,३०० कोटींचा निधी रुग्णालयांना वितरित करण्यात आला असून, योजनेची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक राहील, यावर भर दिला जाणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.