BREAKING : कर्जमुक्तीसाठी शेतकरी आंदोलन आक्रमक! जळगाव जामोदमध्ये तहसील कार्यालयावर चढून आंदोलन; उदयनगरात पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी...
उदयनगर येथे आंदोलन
दुसरीकडे चिखली तालुक्यातील उदयनगर येथेही शेतकरी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. गेल्या अर्ध्या तासापासून आंदोलक टाकीवर ठिय्या देऊन बसले असून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला समर्थन देत जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. १५ जूनपासून बुलढाण्यातील त्यांच्या निवासस्थानासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. विविध भागांत आंदोलनाची तीव्रता वाढत असताना काही ठिकाणी हिंसक घटनाही घडत आहेत. किनगाव जट्टू येथे एसटी बस पेटल्याची घटना, खामगाव येथे मध्यरात्री एसडीओ कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न आणि पेठ पुलावर टायर जाळून केलेले आंदोलन यामुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.
रविकांत तुपकर यांनी मात्र आंदोलक शेतकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. "शेतकऱ्यांचा लढा लोकशाही मार्गाने आणि शांततेत सुरू राहावा, कायदा हातात घेऊ नये," असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र शासनाकडून अद्याप ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना अधिक तीव्र होत असल्याचे चित्र राज्यभर दिसून येत आहे.