जिल्हाधिकारी कार्यालयात बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक! आ. श्वेताताई म्हणाल्या, बँकांसाठी शेतकरी नसून शेतकऱ्यांसाठी बँका आहेत!

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बँकांसाठी शेतकरी नसून शेतकऱ्यांसाठी बँका आहे, हे बँकातील अधिकारी कर्मचारी यांनी नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. या देशातील जवळजवळ ७० टक्के लोक आजही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शेतीशी संबंधित असून ग्रामीण भागातील बँकांचे तेच मोठे ग्राहक आहेत. त्यामुळे नेहमी कानावर येणाऱ्या शेतकऱ्यांसोबत गैर वर्तणूक केल्याच्या तक्रारी आता सहन केल्या जाणार नाही अशी स्पष्ट ताकीद चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले यांनी संबंधितांना दिली.
    आमदार सौ श्वेता महाले यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांची आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने एक बैठक आयोजित करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. आमदार सौ श्वेता महाले यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी "पीक कर्ज वाटप आढावा व विविध योजनांची प्रलंबित प्रकरणे या विषयाशी संबंधित विशेष बँकर्स सभेचे आयोजन व बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी यांच्यासोबतच,अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री सिंग त्याचप्रमाणे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, व सर्व प्रमुख बँकांचे अधिकारी हजर होते.
 या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला मार्गदर्शन व सूचना देताना आमदार सौ श्वेता महाले यांनी बँकिंग क्षेत्रातील अनेक कमजोर बाबींवर बोट ठेवले. अनेक वेळा शेतकऱ्यांना पूर्ण कागदपत्रे सादर केल्यानंतरही बँकेच्या अनेक चकरा माराव्या लागतात, तरी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत विनातारण कर्ज, कागदपत्रे सादर केल्यानंतर तीन ते चार दिवसात देण्याची व्यवस्था करावी.असे सौ. महाले यांनी सुचविले. काही राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांकडून मुद्दाम कमी पीक कर्ज वाटप केले जात आहे, याकडे लक्ष वेधून सौ. महाले यांनी अशा शाखांवर पीक कर्ज वितरणाचे प्रमाण तातडीने वाढवावे असे आदेशित केले. राष्ट्रीयकृत बँकातील अधिकारी व कर्मचारी यांना स्थानिक लोकांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर वाढवावा जेणेकरून शेतकऱ्यांशी संवाद साधताना व त्यांच्या अडचणी जाणून घेताना अधिकाऱ्यांना अडचण जाणार नाही अशी सूचना त्यांनी केलीजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने इतर कुठल्याही क्षेत्राला कर्ज देण्यापेक्षा आपल्या स्थापनेचा मूळ उद्देश लक्षात घेऊन मायबाप शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना सर्वोच्च प्राधान्य द्यावे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 100% पीक कर्ज वाटप करावे अशी सूचनाही आ. सौ. श्वेता महाले यांनी दिली. बँकातील अनेक कामांसाठी शेतकरी बँकांमध्ये खोळंबून राहतात यावेळेस बँकेतील अधिकाऱ्यांकडून मनुष्यबळाची कमतरता हे कारण दिले जाते तरी क्षेत्रीय जिल्हा प्रबंधकांनी ग्रामीण शाखा मध्ये मनुष्यबळ व पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात तसेच संपूर्ण देशातच आपल्या मतदारसंघाप्रमाणे लघु व सीमांत शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी यांचे प्रमाण प्रचंड असल्याने पीक कर्ज देताना त्यांचे सिबिल स्कोर एवढाच असला पाहिजे अशी सक्ती करण्यात येऊ नये . प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती विमा योजनेमध्ये बँकांनी जास्तीत जास्त नागरिकांना स्वयंस्पर्तीने समाविष्ट होण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे व या विमा योजनांचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होईल याकरता विशेष लक्ष दिले पाहिजे असे आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी सुचवले. शेतकऱ्यांना, नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदाने, मदत याची बँकांकडून परस्पर कपात केली जाते त्याचप्रमाणे विविध कारणांसाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला होल्ड लावण्यात येतात. तरी अतिशय महत्त्वाच्या कारणाशिवाय परस्पर अशा कपाती केल्या जाऊ नये व होल्ड लावण्यात येऊ नये असे आमदार श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या...