मुंबईत वातावरण टाईट! शेकडो कार्यकर्ते स्थानबद्ध, ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त; रविकांत तुपकर ‘आऊट ऑफ रडार’! पोलिसांना चकमा देत थेट आंदोलनस्थळी प्रगटणार?

 
 मुंबई:(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी आज, २७ ऑगस्ट रोजी मुंबईत पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करण्याच्या घोषणेमुळे पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मुंबईकडे निघालेल्या शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, रविकांत तुपकर अद्याप ‘आऊट ऑफ रडार’ असून पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

लातूर मध्ये ५० गाड्यांचा ताफा अडवला!प्रत्येक जिल्ह्यात गाड्या अडवल्या 

मुंबई आंदोलनासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी विविध मार्गांवर नाकाबंदी आणि तपासणी सुरू केली आहे. लातूर–सोलापूर मार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्यासह तब्बल ५० गाड्यांचा ताफा काल सायंकाळी पोलिसांनी अडवला. या ताफ्यातील कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती आहे. बुलढाणा, खामगाव, चिखलीसह विविध भागांतून मुंबईकडे निघणाऱ्या कार्यकर्त्यांवरही पोलिसांची नजर आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांची वाहने अडवली जात आहेत.आंदोलनस्थळी पोहोचण्याआधीच कार्यकर्त्यांना रोखण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

मंत्रालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

तुपकरांनी आज सकाळी १० वाजता मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक जाहीर लिलाव करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मंत्रालय परिसरासह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एकीकडे पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला असताना दुसरीकडे तुपकर मात्र ‘आऊट ऑफ रडार’ आहेत. ते नेमके कुठे आहेत, याबाबत प्रचंड गुप्तता आहे.

शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन

रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, जुन्या कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, तसेच कर्ज पुनर्गठनामुळे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या तुपकरांनी केल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच आंदोलनाच्या माध्यमातून मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करण्याची घोषणाही तुपकरांनी केली आहे.

रविकांत तुपकरांच्या यापूर्वीच्या आंदोलनांचा इतिहास पाहता त्यांनी अनेकदा पोलिसांच्या बंदोबस्ताला चकवा देत आंदोलनस्थळी अचानक हजेरी लावली आहे. त्यामुळे यावेळीही पोलिसांना चकवा देऊन तुपकर थेट आंदोलनस्थळी प्रगटणार का, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. पोलिसांचा चौफेर वेढा, कार्यकर्त्यांची धरपकड आणि मार्गांवर नाकाबंदी असतानाही तुपकर ‘आऊट ऑफ रडार’ असल्याने पुढच्या काही तासांत नेमके काय घडते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

‘काहीही झाले तरी आंदोलन होणारच!’

पोलिसांनी कितीही अडथळे निर्माण केले, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले किंवा मार्ग बंद केले तरी आंदोलन होणारच, अशी आक्रमक भूमिका तुपकरांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेली लढाई कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आज सकाळी १० वाजता जाहीर केलेले आंदोलन प्रत्यक्षात कसे आणि कुठे होते, तुपकर अचानक आंदोलनस्थळी पोहोचतात का आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त त्यांच्या आंदोलनाला रोखू शकतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.