शेतीत दरवर्षी तोटा; हाती काहीच लागत नव्हते! टोकाचा निर्णय घेतला; साखरखेर्डा येथील घटना....

 
 
साखरखेर्डा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): साखरखेर्डा शेतकरी पुत्र शेख निसार शेख अब्बास (वय ३८) याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे २३ मार्च २०२५ रोजी सकाळी उघडकीस आले.
शेख निसार शेख अब्बास यांच्याकडे वडिलोपार्जित ३ एकर २० गुठे शेती असून साखरखेर्डा भाग दोनमध्ये आहे. कोरडवाहू शेती असल्याने खरीप हंगामातील पिकाशिवाय दुसरे पिक घेता येत नाही. त्यामुळे निसार याने छोटासा चहाचा व्यवसाय सुरु केला होता. त्यावर आई, वडील, भाऊ, बहिण, दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. शेती व्यवसायात दरवर्षी तोटा सहन करावा लागत असल्याने हाती काहीच लागत नव्हते. या विवंचनेत शेख निसार याने टोकाचे पाऊल उचलले. २२ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता निसार हा घरुन निघून गेला. तो रात्री उशिरापर्यंत परत आला नाही. सकाळी वार्ड क्रमांक एक मधील नागरिकांना दुरवर एका शेतात लिंबाच्या झाडाला कोणीतरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. नागरिकांनी याची माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली.