आठवडाभरात पिकविम्याचे पैसे न मिळाल्यास आक्रमक आंदोलन! रविकांत तुपकरांचा इशारा, पुणे येथे कृषी आयुक्तालयात अधिकाऱ्यांना भरला दम...
Jan 17, 2025, 20:47 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही रविकांत तूपकर यांनी दिलेली आहे. दिलेल्या शब्दाप्रमाणे रविकांत तुपकर अद्यापही शांत बसलेले नाहीत, कधी मुक्काम आंदोलन, कधी ठिय्या,कधी मंत्री महोदयांशी चर्चा या माध्यमातून पिकविण्यासाठी रविकांत तुपकर यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आज , १७ जानेवारी रोजी त्यांनी पुणे येथे कृषी आयुक्तालयात पिक विम्याच काम पाहणारे मुख्य सांख्यिकी यांची भेट घेऊन पिकविमा बाबत त्यांच्याशी चर्चा केली. आठ दिवसात शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू, त्यामुळे होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहा असा दम देखील रविकांत तुपकरांनी यावेळी अधिकाऱ्यांना भरला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढा देणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात धडक देत पिक विम्याचा प्रश्न चांगलाच लावून धरला. पिकविमा आणि नुकसान भरपाईसाठी रविकांत तुपकर सातत्याने लढा देत आहेत. अगदी गल्लीपासून ते मुंबईपर्यंत त्यांनी आक्रमक आंदोलने केली आहेत. गेल्या महिन्यातच त्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात मुक्काम आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा निवेदनाच्या माध्यमातून पिक विम्याचा पाठपुरावा केला. त्यानंतर पुन्हा आक्रमक होत. ६ जानेवारी रोजी बुलढाणा जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक देत ३ तास ठिय्या मांडला होता. त्यावेळी कृषिमंत्री मा.ना.ॲड.माणिकरावजी कोकाटे यांच्याशी फोनवरून संवाद साधत तातडीने शेतकऱ्यांना पिकविमा देण्याची मागणी केली. यावर कॅबिनेटमध्ये पिकविम्याच्या विषयावर निर्णय घेण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले हॊते. शिवाय राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याशी देखील त्यांनी पिक विम्याबाबत चर्चा करून शासन दरबारी हा प्रश्न लावून धरण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता आज ,१७ जानेवारी रोजी रविकांत तुपकरांनी थेट पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात धडक दिली.
राज्याचं पिक विमा कंपन्यांचे काम पाहणारे मुख्य सांख्यिकी यांची भेट घेऊन त्यांनी पिक विम्याबाबत चर्चा केली. बुलढाणा जिल्ह्यात AIC पिकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या १ लाख २६ हजार २६९ शेतकऱ्यांना अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देवून अपात्र केलेल्या ७० हजार ८३१ शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. 'त्या' शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. पिकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३३ कोटी ८३ लक्ष रु. रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांची तसेच राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याची रक्कम बाकी आहे.
त्यांची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम जमा करू, असे कंपनीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाकडे बाकी असलेला कंपनीचा हिस्सा उपलब्ध करून देत वंचित शेतकऱ्यांना तातडीने पिक विमा रक्कम देण्यासाठी कंपनीला बाध्य करावे, अशी मागणी रविकांत तुपकरांनी आक्रमकपणे मांडली. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पिक विम्याचे दावे कमी आलेले आहेत ज्या जिल्ह्यांचे टार्गेट पूर्ण झालेले नाहीत अशा जिल्ह्यांमधून शासनाकडे पैसे रिफंड केले जातात. या रिफंड झालेल्या पैशांमधून शेतकऱ्यांची ही रक्कम अदा करण्याचा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर करणार असल्याचे मुख्य सांख्यिकी यांनी रविकांत तूपकर यांना सांगितले. आठ दिवसांमध्ये जर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही तर आक्रमक आंदोलन उभारले जाईल त्यामुळे होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी तयार राहा असा सज्जड दम यावेळी रविकांत तुपकरांनी सदर अधिकाऱ्यांना भरला.यावेळी राम अंभोरे, सचिन पांडुळे, संदीप पवार यासह शेतकरी उपस्थित होते.