Exclusive लोकशाहीचा खरा अर्थ! टीकेला उत्तर शब्दांनी नव्हे, कृतीने; 'बुलडाणा लाइव्ह'च्या वृत्ताची सीईओ खरात यांनी घेतली सकारात्मक दखल, शुक्रवारी उशिरापर्यंत कार्यालयात थांबून विभागनिहाय घेतला आढावा...

 
बुलडाणा (कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकशाहीत प्रसारमाध्यमांची भूमिका केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसते, तर प्रशासनाला अधिक उत्तरदायी आणि जनाभिमुख बनविण्याचीही असते. बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या सोमवार आणि शुक्रवारच्या उपस्थितीबाबत "बुलडाणा लाइव्ह"ने नुकतेच सडेतोड वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त कोणत्याही व्यक्तीद्वेषातून नव्हे, तर पत्रकारितेच्या मूल्यांशी प्रामाणिक राहत, जनहिताच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध करण्यात आले होते.अनेकदा अशा वृत्तांवर आक्षेप, नाराजी किंवा प्रतिआक्रमण होताना दिसते. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी या वृत्ताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहिले. माध्यमांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला त्यांनी सकारात्मकपणे स्वीकारत त्याचे उत्तर प्रत्यक्ष कृतीतून दिले.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी असलेल्या शुक्रवारी श्री. खरात यांनी सायंकाळी वृत्त लिहीपर्यंत ( सायंकाळी ६) वाजेपर्यंत जिल्हा परिषदेत थांबून कामकाजाचा सखोल आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड तसेच समाजकल्याण अधिकारी श्री. एंडोले हेही त्यांच्या समवेत उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांनी एकाच दालनात बसून अहवाल मागविण्याऐवजी स्वतः प्रत्येक विभागात जाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. प्रलंबित कामे, विविध योजनांची अंमलबजावणी, फाईल्सची स्थिती आणि विभागनिहाय कामकाजाचा बारकाईने आढावा घेतला.

ज्या विभागांमध्ये हलगर्जीपणा, दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळून आला, त्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत जाब विचारला. तर ज्या विभागांमध्ये समाधानकारक आणि दर्जेदार काम होत असल्याचे दिसून आले, त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. प्रशासनात शिस्त आणि चांगल्या कामाला प्रोत्साहन या दोन्ही बाबींचा समतोल साधण्याचा प्रयत्न या पाहणीतून दिसून आला.

लोकशाहीच्या चार आधारस्तंभांपैकी पत्रकारिता आणि कार्यपालिका हे दोन अत्यंत महत्त्वाचे स्तंभ आहेत. पत्रकारिता प्रशासनातील त्रुटी निदर्शनास आणून देते, तर संवेदनशील प्रशासन त्या सूचनांमधून स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणते. टीका म्हणजे विरोध नव्हे, तर सुधारण्याची संधी असते, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. प्रशासनाने माध्यमांच्या विधायक सूचनांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यावर प्रत्यक्ष कृती केली, तर त्याचा सर्वाधिक लाभ सामान्य नागरिकांनाच होतो. बुलडाणा जिल्हा परिषदेत शुक्रवारी दिसलेले चित्र हे लोकशाहीतील विधायक पत्रकारिता आणि उत्तरदायी प्रशासन यांच्या सुसंवादाचे सकारात्मक उदाहरण ठरले.