लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा ₹३४४.७४ कोटींचा निधी वळवला? ठाकरे गट आक्रमक; ‘निधी पूर्ववत करा’ म्हणत मुख्यमंत्र्यांना इशारा...

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल ₹३४४.७४ कोटींचा निधी वळविण्यात आल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या विकासासाठी मंजूर असलेला हा निधी तातडीने पूर्ववत करून त्याचा वापर संबंधित समाजाच्या विकासासाठीच करावा, अशी मागणी सामाजिक न्याय आघाडीचे बुलढाणा जिल्हा उपप्रमुख मिलिंद गवई यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच विविध वंचित घटकांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे, शैक्षणिक सुविधा, कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून संबंधित समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीला चालना दिली जाते. त्यामुळे या योजनांसाठी मंजूर झालेला निधी अन्यत्र वळविणे म्हणजे वंचित घटकांच्या विकासाच्या संधींवर परिणाम करणारे पाऊल असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

‘लाडकी बहीण’ला विरोध नाही; पण हक्काचा निधी नको वळवायला!

लाडकी बहीण योजनेला पक्षाचा विरोध नसल्याचे स्पष्ट करताना, या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा समाजाच्या हक्काचा निधी वापरण्यास ठाम विरोध असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी शासनाने स्वतंत्र आणि पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. एका घटकाला मदत देताना दुसऱ्या वंचित घटकाच्या हक्काच्या निधीवर गदा आणणे योग्य नाही, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

निधी वळतेकरणाची श्वेतपत्रिका काढा

सामाजिक न्याय विभागाचा निधी भविष्यात अन्य योजनांसाठी वळविला जाऊ नये, यासाठी शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय यापूर्वी झालेल्या निधी वळतेकरणाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून लेखाशीर्षनिहाय मंजुरी आणि प्रत्यक्ष खर्चाची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
“समाजाच्या हक्काचा निधी समाजाच्या विकासासाठीच वापरला पाहिजे,” अशी ठाम भूमिका शिवसेनेने मांडली. शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर या अन्यायाविरोधात लोकशाही आणि संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी शहर संपर्कप्रमुख सुनील भाग्यवंत, शहरप्रमुख विजय राऊत, सामाजिक न्याय आघाडी जिल्हाप्रमुख मिलिंद गवई, मनोज चंदन, सामाजिक न्याय आघाडी उपतालुकाप्रमुख श्रीकांत जाधव, महिलाआघाडी तालुकाप्रमुख अनिता जाधव, उपतालुकाप्रमुख भावना पाटील यांच्यासह सुनंदा खरात, भारती डागोर, वैशाली मिसाळ, शारदा दाभाडे, नीता चव्हाण, सुवर्णा जाधव, रूपाली चव्हाण, रोशनी गरड, सविता राऊत, सुनिता दराखे, स्वाती लोंढेकर, पूजा शिंगणे, सपना इंगळे, शितल सुरडकर, वंदना मेढे, ज्योती गायकवाड, गंगा काकडे, उज्वला हिवाळे, मालती गवई, कल्पना गाडेकर, सुनीता तायडे, सुमन भालेराव, शांता गवई, विद्या गाडेकर, देवका गवई, नेहा खराटे, गोकुर्णा सुपाडा खराटे, रेखा सोमस, रंजना मोरे, वंदना गाडेकर, राधा सोमस, आशा गाडेकर, विमल गाडेकर, बेबा गाडेकर, गजानन गवई यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.