मायबाप शेतकऱ्यांचा आवाज शिवसेना (उबाठा) करणार बुलंद; २९ सप्टेंबर रोजी बुलढाण्यात मोर्चाच्या तयारीसाठी नियोजन बैठक संपन्न! शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याच भाजपचे धोरण : उपनेते आमदार नितीनबापू देशमुख...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शिवसेना ही समाज हितासाठी काम करते. मातोश्री वरून आलेला आदेश शीरसावंद्य मानत समाजाच्या सुखदुःखामध्ये शिवसैनिक धावून जातो. आज मायबाप शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावल्या जात आहे. पावसाचा  दीर्घ स्वरूपात खंड पडल्याने कोरडा दुष्काळ राज्यभरात जाहीर होणे गरजेचे असताना राज्यातील भाजप, शिंदे गटाचे सरकार जाणून बुजून डोळे झाक करत असल्याने मायबाप शेतकऱ्यांचा आक्रोश आणि त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन आगामी काळात करणार असल्याची घोषणा उपनेते नितीनबापू देशमुख यांनी केली. सोबतच भाजपाचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे धोरण असून शेतकरी जगला काय किंवा मेला काय यासाठी या सरकारला कुठलेही  सोयर सुतक नसल्याचे देखील यावेळी आमदार नितीन बापू देशमुख म्हणाले.

 ​​बुलढाणा येथील ओमकार लॉन्स येथे घाटावरील बुलढाणा, चिखली, मेहकर आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज भरगच्च उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी आगामी २९ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या संदर्भात नियोजनात्मक स्वरूपामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच एसआयआर प्रक्रियेमध्ये मतदारांची काढण्यात आलेली नाव आणि नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या नावांच्या संदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या. तसेच अमरावती शिक्षक मतदार संघात भगवा फडकवण्यासाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय श्रीराम लहाने सर यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर शिक्षक मतदारांची संपर्क साधून लहाने सरांच्या विजयासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. 

यावेळी व्यासपीठावर  बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, सह संपर्कप्रमुख डी. एस. लहाने सर,  जिल्हा समन्वयक गजानन धांडे, जिल्हा संघटक गोपालभाऊ बच्छिरे, एड. सुमित सरदार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजयाताई खडसन, अकोला जिल्हा संघटक भूषण भिराड, राहुल कऱ्हाळे, आशिष गावंडे, उपजिल्हाप्रमुख आशिषभाऊ रहाटे, बद्रीभाऊ बोडके, विलास सुरडकर, लखन गाडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, युवती सेना जिल्हाप्रमुख कल्पनाताई पाटील,  तालुकाप्रमुख विजय इतवारे, विजय इंगळे, श्रीकिसन धोंडगे, निंबाजी पांडव, राजू बुधवत, दादाराव खार्डे, आत्माराम शेळके, प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख गजानन उबरहंडे, बुलढाणा शहर संपर्कप्रमुख सुनील भाग्यवंत, शहर प्रमुख विजय राऊत,  कल्पनाताई पुरी,  अनिताताई जाधव, दिपालीताई पाटील, भावनाताई पाटील यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार नितीन बापू देशमुख म्हणाले की , दिलेला शब्द पाळणे हे केवळ ठाकरेच करू शकतात. उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमुक्तीची घोषणा केली आणि दिलेला शब्द पाळला. फडणवीस सरकार मात्र याद्यांमध्येच अडकून पडली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे मोठे संकट ओढावले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती काही वेगळी नाही. सात पैकी सहा सत्ताधारी आमदार , केंद्रात आणि राज्यात मंत्रीपद असतानाही शेतकऱ्यांसाठी यांना वेळ नाही. त्यामुळे ही विरोधी पक्ष म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. आपण सर्वच शेती मातीतली माणस आहोत. आज शेतकऱ्यांसोबतच शेतकऱ्यांच्या मुलाबाळांवर देखील मोठे संकट आहे. आधी नोकरीसाठी मुलगा शोधताना त्याच्याकडे शेती आहे का हे शोधल्या जायचे. मात्र आता शेतकरी नवरा नको असल्याची चिंताजनक बाब प्रकर्षाने लक्षात येते. शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात शासन कमी पडले आहे. भाजपचे धोरणच शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा आहे असा घनाघात देखील आमदार नितीनबापू देशमुख यांनी केला. संपूर्ण वराडात नव्हे तर विदर्भात सुद्धा आगामी काळात शेतकऱ्यांचा हा आवाज आपल्याला रस्त्यावर उतरून बुलंद करायचा असल्याचे ते म्हणाले. 


सुरुवातीला छत्रपती श्री. शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.  यावेळी बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी आपल्याला आगामी काळात या मोर्चाच्या दृष्टीने गावागावात शेतकऱ्यांशी संपर्क करावयाचा  असून एस आय आर मध्ये सुद्धा कमी झालेली नावे आणि त्यांची माहिती घेण्याच्या सूचना केल्या. हा आपल्यासाठी संघर्षाचा काळ आहे.  मात्र आपण सर्वजण लढणारे मावळे आहोत असेही प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणाले. आमदार सिद्धार्थ खरात यांनी पावसाने मारली दडी ही चिंताजनक आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारला बाध्य करू आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ असे सांगितले. राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी महायुती सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम करत असल्याचा घणाघाती हल्ला चढवला. २९ सप्टेंबरच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची ताकद या सरकारला दाखवून देऊ असंही यावेळी त्या म्हणाल्या. प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावात असलेल्या शिक्षक मतदारांशी समन्वय साधून आपल्या विजयासाठी पसंती क्रमांक एक चे हक्काचे मतदान मागण्याचे आवाहन केले. जालिंदर बुधवत यांनी  प्रास्ताविकातून या बैठकीची भूमिका विषद केली. सूत्रसंचालन व आभार  प्रदर्शन जिल्हा सामन्वयक गजानन धांडे यांनी केले. यावेळी सर्व उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख शहर प्रमुख आणि अंतर्गत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांची भरगच्च उपस्थिती होती.