पीएम किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांप्रति केंद्र सरकारची बांधिलकी!  केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन....

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): “शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याला आर्थिक हातभार देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली असून, ही योजना ही केंद्र सरकारची शेतकरीप्रति असलेली बांधिलकी दर्शवते,” असे प्रतिपादन केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. वाराणसी येथे मुख्य कार्यक्रम पार पडला, तर बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. झापे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, प्रकल्प संचालक आत्मा पुरुषोत्तम उन्हाळे तसेच युवासेना नेते कुणाल गायकवाड उपस्थित होते.

“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने आणि शेतीत नवनवीन प्रयोग करता यावेत यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. वेळेवर मिळणारी ही आर्थिक मदत बियाणे खरेदीसारख्या महत्वाच्या गरजांसाठी उपयुक्त ठरते. ही योजना ही अन्नदात्याच्या कष्टाचा सन्मान करणारी आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी,” असे आवाहन जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांसोबत बसून ऐकले पंतप्रधानांचे भाषण...

पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला. या निमित्त वाराणसी येथील मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दाखविण्यात आले. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या सोबत बसून एलईडी स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. “आपण प्रथम शेतकरी आणि नंतर मंत्री,” हा संदेश त्यांच्या साध्या वर्तनातून शेतकऱ्यांना मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले.