कोथळी–तरोडा रस्ता गेला खड्डयात, दुरुस्तीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक; ५ जानेवारीपर्यंत डांबरीकरण करा अन्यथा ६ पासून आमरण उपोषणाचा इशारा...
या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, काहींना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना तसेच रुग्णवाहिकांनाही या रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड अडचणी सहन कराव्या लागत आहेत. परिणामी, नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
फक्त किनारे भरले; प्रत्यक्ष रस्ता दुर्लक्षित
काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे किनारे भरून काढण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे हा उपाय तात्पुरता ठरला असून, रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ५ जानेवारी २०२६ पर्यंत कोथळी–तरोडा रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण न झाल्यास, ६ जानेवारी २०२६ पासून संबंधित रस्त्यावरच आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे. या रस्त्याची दुरुस्ती ही केवळ विकासाचा नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याचे सांगत, प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे.निवेदनावर महेंद्र जाधव, अमोल मोरे, अतुल खिरोडकर, पवन काकडे यांच्यासह इतरांची स्वाक्षरी आहे.