पैनगंगा नदिकाठच्या शेतकऱ्यांचे सवण्यात पाण्यात बसून आंदोलन!  स्वयंचलित गेटमुळे होतेय शेतीपिकांचे नुकसान...

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांची पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीसमोर हतबल अवस्था झाली आहे. येळगाव धरणावरील स्वयंचलित गेट अचानक उघडल्याने मोठ्या पुराचा प्रकोप झाला व नदीकाठची उभी पिके तसेच शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या निष्काळजीपणाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज पहाटेपासूनच आंदोलनाला सुरुवात केली.
चिखली-येळगाव धरणावर ८० स्वयंचलित गेट बसविल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात बुलढाणा, चिखली आणि मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. धरणातील गेट अचानक उघडल्याने पाण्याचा विसर्ग सुरू होतो व नदीकाठच्या शेतात पाणी शिरून उभी पिके वाहून जातात. जमिनीची सुपीक माती खरडली जाते.

शेतकऱ्यांनी याआधीच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून उपाययोजनेची मागणी केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पावसाळ्यात चार गेट कायमस्वरूपी खुले ठेवण्याचे आश्वासन नगर परिषद बुलढाणा यांनी दिले होते. मात्र, याची अंमलबजावणी न झाल्याने एकाचवेळी गेट उघडल्याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे.

या पार्श्वभूमीवर विनायक सरनाईक, नितीन राजपुत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुलढाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये शिवाजी देवडे, मोजिन पिंजारी, प्रल्हाद देवडे, गणेश भोलाने, समीर जमदार, शरद शेळके, शेख जफर, फिरोज खान पठाण, शेख इस्माईल, शेख रफिक, प्रवीण कस्तुरे, शेख अन्सार, शेख अयाज, शेख सत्तार, शेख इसाक, शेख अशपाक, शिवनारायण पवार, समाधान सुरडकर, भगवान देवरे, दिलीप खेडेकर, प्रकाश पवार, अरुण कस्तुरे, आयुष शेळके आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

शेतकऱ्यांचा ठाम पवित्रा आहे की,प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करावी. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील...