रस्त्यासाठी टोकाचे आंदोलन! मोताळ्यात उद्धव सेनेच्या नेत्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न...
घटनेची माहिती मिळताच उपस्थित कर्मचारी व पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या.
दरम्यान, रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
तहसीलदारांवर गंभीर आरोप; पुढील आंदोलन महसूल मंत्र्यांच्या बंगल्यासमोर
आंदोलनानंतर उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे यांनी सांगितले की, शेलापूर–सांगद शेतरस्ता खुला करण्याबाबत त्यांनी वेळोवेळी मोताळा तहसीलदारांकडे निवेदने सादर केली. तसेच महसूल विभागाने शेतरस्ते खुले करण्यासाठी राबविलेल्या विशेष पंधरवड्यातही या रस्त्याचा प्रश्न मांडण्यात आला होता. मात्र तहसीलदारांनी या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
“२५ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात एक महिन्यात रस्त्याचे काम न झाल्यास २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तरीही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच आम्हाला आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागला. पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तो पूर्ण होऊ शकला नाही,” असे घाटे यांनी स्पष्ट केले.
रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात न आल्यास आता थेट महसूल मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.