ई केवायसी करा, अन्यथा पीएम किसानचा लाभ विसरा; २,९८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित; ३,८२७ जणांचे आधार सीडिंग बाकी; कृषी विभागाचा इशारा...
या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी, आधार सीडिंग तसेच बँक खाते DBT Enable करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते DBT Enable झालेले नाही, त्यांनी India Post Payments Bank मध्ये खाते उघडून ते आधारशी संलग्न करून DBT Enable करून घ्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून शेतकरी कुटुंबांना वार्षिक प्रत्येकी ६ हजार रुपये दिले जातात. यासोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत आणखी ६ हजार रुपये वितरित केले जातात. अशा प्रकारे एकूण १२ हजार रुपये प्रतिवर्षी शेतकरी कुटुंबांना थेट लाभाच्या स्वरूपात मिळतात.मात्र, या लाभासाठी ई-केवायसी व आधार सीडिंग अनिवार्य असून प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास संबंधित शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय तसेच ग्राम नोडल अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. यामुळे कोणताही पात्र शेतकरी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.