सासरवाडीत येऊन पत्नीचा खून केला नंतर दोन चिमुकल्या मुलींसह पतीने घेतली तलावात उडी! बुलडाणा शहरातील खळबळजनक घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सासरवाडीत येऊन पत्नीचा चाकूने वार करून खून केला. खुनानंतर दोन चिमुकल्या मुलींना घेऊन पतीने जवळच असलेल्या तलावात उडी घेतली. मात्र लोकांनी तिघांना वाचवले. ही खळबळनक घटना आज, ९ ऑगस्टला सकाळी पावणेदहाच्या सुमारास बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीजवळ घडली.
गीता गजानन जाधव (२७, रा. जालना) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ती आपल्या श्रुद्धी (५) आणि श्रेया या दोन चिमुकल्या मुलींना घेऊन माहेरी बुलडाणा येथे आलेली होती. बुलडाण्यातील त्रिशरण चौक परिसरातील स्मशानभूमी रोडवर गीताचे वडील सुरेश तायडे राहतात. कालच तिचा पती गजानन जाधव हासुद्धा बुलडाणा येथे आला होता. आज सकाळी त्याने पत्नीवर चाकूने सपासप वार केले.
त्यानंतर जवळच असलेल्या संगम तलावात श्रुद्धी आणि श्रेया या चिमुकल्या मुलींना घेऊन त्याने उडी मारली. जवळच लोकवस्ती असल्याने तेथील लोकांना आवाज आल्याने त्यांनी तलावाच्या दिशेने धाव घेत तिघांना वाचवले. त्याला पकडून ठेवले. तोपर्यंत गीताला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शहर पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. संशयाच्या कारणावरून त्याने पत्नीचा खून केल्याची माहिती समोर येत आहे.