रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धा; व्हा सहभागी!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ अशा सहा पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान १० आर (०.१० हेक्‍टर) क्षेत्र आवश्यक आहे.

तालुक्यात ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र १ हजार हेक्टरहून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पीक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरिता भाग घेण्यासाठी रुपये ३०० प्रति शेतकरी प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क राहील.

तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हाभर राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता ते काढून केवळ तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका जिल्हा विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे. रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

असे आहे पारितोषिक...
स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गटात आहे. तालुका पातळीवर पहिले बक्षीस ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय बक्षीस २ हजार रुपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार रुपये, विभाग पातळीवर पहिले बक्षीस २५ हजार, द्वितीय २० हजार तृतीय १५ हजार व राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार, द्वितीय ४० हजार, तृतीय ३० हजार रुपये असणार आहे.