सात तालुक्यांतील पाऊस चिंताजनकच! ऑगस्ट अखेरीसही ५२ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद!! खरीप पिकांची वाढ खुंटली; लाखो शेतकरी चिंताग्रस्त
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः अर्धाधिक पावसाळा आणि ऑगस्ट संपत आला तरी जिल्ह्यातील तब्बल ७ तालुक्यांतील पावसाचे प्रमाण चिंताजनक असल्याने लाखो हेक्टरवरील खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे लाखो शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
यंदा पावसाने आधीपासूनच लहरीपणा दाखविला. सध्याही वरुणराजाचा लहरीपणा कायमच असल्याचे दिसून येते. मेहकर तालुक्यात तब्बल ९२ टक्के म्हणजे ४६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय सिंदखेडराजा ७९ टक्के, लोणार ६७, चिखली ६४, देऊळगाव राजा ६२, खामगाव ६१ टक्के असे प्रमाण आहे. या तुलनेत अन्य ७ तालुक्यांतील पावसाची आकडेवारी चिंताजनकच आहे.
यामध्ये घाटाखालील तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. बुलडाणा तालुक्यात आजवर केवळ ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय संग्रामपूर ५२, नांदुरा ४०, मोताळा ४४ टक्के, जळगाव जामोद ३९ टक्के, मलकापूर ३८ टक्के पावसाची नोंद आहे. हा पाऊस अत्यंत तोकडा व अपुरा आहे. यामुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर, मका आदी पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही आभाळाकडे लागलेल्या आहेत.