शेतकऱ्यांसाठी काल काँग्रेस; आज भाजपचे धरणे आंदोलन
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊन शिथिल होताच विविध प्रश्नांवर राजकीय पक्षांच्या आंदोलनांनी जोर पकडला आहे. काल काँग्रेसने नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले, तर आज, २२ जूनला सकाळी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चानेही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालत धरणे आंदोलन केले.
२०२०-२१ मध्ये पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठण करावे. कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज त्वरित माफ करावे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई त्वरित मिळावी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ ५० हजार रुपयांची मदत मिळावी आदी आंदोलकांनी केल्या. आंदोलनात किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय जगताप, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, कुलदीप पवार, राजेश्वर उबरहंडे, अर्जुन दौंडगे, विनायक भाग्यवंत यांच्यासह भाजपा किसान मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.