मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची इच्छाशक्तीच नाही ः नरेंद्र पाटील यांचा बुलडाण्यात आरोप
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कायदेशीर व सामाजिक बाजू योग्य पद्धतीने मांडल्यास मराठा आरक्षण मिळू शकते. मात्र महाविकास आघाडी सरकारची मराठा आरक्षणाबाबत इच्छाशक्ती दिसत नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कधीच मराठ्यांच्या हिताचे काम केले नाही. सकल मराठ्यांचा लढा पुन्हा उभारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माथाडी कामगार तथा मराठा नेते नरेंद्र पाटील यांनी केले.
बुलडाण्यातील विश्रामभवनात घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार श्वेताताई महाले, भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख, जिल्हा महामंत्री संतोषराव देशमुख, जगदेवराव बाहेकर, डॉ. राजेश्वर उबरहंडे, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा उपस्थित होते. ओबीसी आरक्षणातून आरक्षणा मिळावे अशी मागणी नसतानाही संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य सत्ताधारी नेते करतात. ते मराठा व ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या काँग्रेसने मराठा आरक्षणाबाबत कधीच ठोस भूमिका घेतली नाही, त्या अशोक चव्हाणांकडे मराठा आरक्षणाबाबतचे सर्वाधिकार सरकारने दिले, असा आरोपही पाटील यांनी केला.