ग्रामपंचायतींना मिळणार 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत ‘आदिशक्ती पुरस्कार’; महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष अभियान

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : 18 जून 2025: राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिला-बालकांच्या सक्षमीकरणासाठी सन 2025-26 पासून 'आदिशक्ती अभियान' राबविण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे ‘आदिशक्ती पुरस्कार’ दिले जाणार आहेत.

महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर काम करणाऱ्या ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे. राज्यभरात या अभियानाद्वारे विविध शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती पोहोचवण्यासाठी विशेष प्रचार व जनजागृती केली जाणार आहे.
पुरस्कारांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे:
तालुकास्तरावर:
 प्रथम क्रमांक – ₹1 लाख
  द्वितीय क्रमांक – ₹50 हजार
  तृतीय क्रमांक – ₹25 हजार
   जिल्हास्तरावर:
  * प्रथम क्रमांक – ₹5 लाख
  * द्वितीय क्रमांक – ₹3 लाख
  * तृतीय क्रमांक – ₹1 लाख
    राज्यस्तरावर:
प्रथम क्रमांक – ₹10 लाख
  द्वितीय क्रमांक – ₹7 लाख
  तृतीय क्रमांक – ₹5 लाख 
महिला व बालविकास विभागाच्या 22 मे 2025 च्या शासन निर्णयानुसार या अभियानास मान्यता देण्यात आली असून, सर्व ग्रामपंचायतींनी तात्काळ विशेष ग्रामसभा घेऊन आदिशक्ती ग्रामस्तरीय समितीची स्थापना करावी आणि अटी व शर्तींची पूर्तता करून स्पर्धेसाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग यांच्याशी संपर्क साधावा.
– रामेश्वर वसु, संरक्षण अधिकारी, बुलढाणा