ओला दुष्काळ जाहीर करा,शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी मदत द्या !उद्धवसेनेचे चिखली तहसील कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन ..!

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाउस झाल्याने साेयाबीन, कपाशी व इतर पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज, २९ सप्टेंबर रोजी चिखली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. 
 आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, जिल्हा संघटक गोपाल बछिरे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, विलास सुरडकर, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, महिला संघटिका विजया खडसन, तालुका प्रमुख किसन धोंडगे यांनी केले.
यावेळी चिखली तालुक्यातील महाविकास आघाडीचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष लढा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विराेधक आक्रमक 
जिल्ह्यात अनेक गावात ढगफुटीसदृश्य पाउस झाला आहे. त्यामुळे, नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेकांच्या पिकात पाणी साचले. त्यामुळे साेंगणीसाठी आलेले साेयाबीन शेतातच राहीले. जिल्ह्यात सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णाचे सर्वच गेट तब्बल दीड फुटाने उघडण्यात आल्याने नदीला पूर आला हाेता. तसेच इतर प्रकल्पही तुडुंब भरल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिक सडली आहेत. शेतकऱ्यांना मदत द्यावी या मागणीसाठी उद्धवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत.