शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर!

अनियमित वीजपुरवठ्यामुळे त्रस्‍त; खामगाव तालुक्‍यातील अटाळीत आंदोलन
 
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहापूर (ता. खामगाव) येथे अनियमित वीजपुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अटाळी उपकेंद्रावर आज, १७ नोव्हेंबरला मोर्चा काढला. यावेळी अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देऊन आठवडाभरात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
रब्बी पिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. अशात वीजपुरवठा नियमित नसल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्‍यामुळे सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अतिश पळसकार यांच्यासह जीवन भुसारी, विश्वनाथ तिजारे, आनंदा पाटील, सुरेश तिजारे, गजानन बराटे, जितू गवई, विजय इंगोले, रामेश्वर तराळे, महेश ताले, जिगोल तापडिया, विजय मोरखडे, संतोष अडकणे, प्रकाश भंडारी, रामेश्वर तराळे आदी शेतकरी उपस्थित होते.