आणखी ११९ एसटी कर्मचाऱ्यांची स्वेच्‍छा मरणाची मागणी!; मलकापूरातून मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू होऊन दोन महिने होत आले आहेत. राज्य शासन आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या भांडणात मात्र सामान्यांचे मरण होत आहे. मागणीवर तोडगा निघत नसल्याने आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी मलकापूर आगारातील ११९ कर्मचाऱ्यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन आज, ३० डिसेंबर रोजी मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
 

तोकड्या पगारामुळे व मानसिक त्रासामुळे राज्यातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे आमच्याही मनात आत्महत्येचा विचार येत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती आता ठीक नाही. आम्ही सतत तणावपूर्ण स्थितीत काम करीत आहोत. इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आमची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. राज्य शासनाला वारंवार विनंती करूनही कोणतीही दखल घेण्यात येत नाही.

आता आम्ही सरकारकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला वैतागलोय. त्यामुळे तुम्ही आता इच्छा मरण्याची परवानगी द्याच, असे निवेदनात म्‍हटले आहे. निवेदनावर मलकापूर आगारातील अतुलसिंह राजपूत, संदीप गावंडे, सुभाष धारकर, विलास गारमोडे, सुनील तायडे, गजानन घोंगळे, सौ. आरती कुसुंबे, पल्लवी इंगळे, रजनी वानखेडे, शिवाजी जगदाळे, दीपा गावंडे, संजय तायडे, उमेश पवार, सचिन नारखेडे, सुनील शिंदे, विनोद लहासे, विजय नाफडे, रामदास संबारे यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.