मुलं रडल्यावर त्याला मोबाईल देता? थांबा! आधी ही बातमी वाचा, तज्ञ काय म्हणतात...होऊ शकते मोठे नुकसान 

 

बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): होय.. हल्ली मुल रडायला लागलं की त्याच्या हातात पालक मोबाईल देतात, पुढच्याच क्षणाला रडणार बाळ त्या मोबाईल मध्ये गुंग होऊन जात..तेवढ्या वेळासाठी बाळाचे रडणे थांबल्याने पालकांना दिलासा मिळत असला तरी अशा सवयीमुळे बाळाच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय याची कल्पना बाळाच्या पालकांना नसते..मात्र याचे घातक परिणाम आता समोर येऊ लागले असून नकळत्या वयात मुलांना मातृभाषेचा विसर पडणे , मानसिक आणि शारीरिक विकास थांबणे, सामाजिक आणि कौटुंबिक भावना न समजणे असे विपरीत परिणाम मुलांवर होत आहेत. त्यामुळे लहान मुलांना मोबाइलच्या अतिरिक्त वापरावर कंट्रोलच हवा असा सल्ला बालरोग तज्ञ देत आहेत.

   बाळ रडायला लागले की ते शांत व्हावे म्हणून त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. मात्र हाच मोबाईल अनेक मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो आहे. मोबाईल मुळे मुलांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होत आहे. ते रिल्समधून मातृभाषेऐवजी चिनी, जपानी व अन्य भाषा शिकत आहेत. डॉक्टर आता रिल्सच्या भाषेतून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जास्त स्कीन टाईम झाल्याने मुले "ऑटीझम" या घातक आजाराला बळी पडत असल्याचे तज्ञांचे म्हणने आहे. मुले रिल्स पाहत असल्याने आईवडिलांना देखील मुलांची भाषा समजायला अडचण निर्माण होत आहे.
"या" घटनेवरून बोध घ्या..
एका नोकरदार जोडप्याने दीड वर्षाच्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी घरात पैसे देऊन एक नानी ठेवली होती. बाळ रडायला लागले की ती त्याला मोबाईल देत असे. वयाच्या दीड वर्षापासूनच तो दिवसातले ६ ते ७ तास मोबाईल बघायचा. त्याचा परिणाम असा झाला की ते मुल सध्या ४ वर्षाचे आहे. मात्र त्याला मातृभाषा बोलता येत नाही, याउलट रिल्समध्ये असलेल्या जपानी, चिनी भाषेतल्या शैलीने तो संवाद साधत आहे.
मुलांवर काय होतो परिणाम?
जास्त स्क्रीन टाईममुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास थांबतो. मुलांचा विकास पूर्णपणे होण्यात अडथळे निर्माण होतात. मोबाईलच्या व्यसनामुळे शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेले खेळही मुले खेळत नाहीत किंवा ते खेळू शकत नाही. सामाजिक जाणिवा आणि कौटुंबिक भावना, नातेसंबंध हे देखील बाळाला कळत नाही,त्यामुळे आता बाळाच्या हाती मोबाईल द्यायचा की त्याला दुसऱ्या खेळात गुंतवायचे तुम्हीच ठरवा..