पुन्हा भरली जुन्या आठवणींची शाळा…! २० वर्षांनी अंचरवाडीच्या श्री शिवाजी विद्यालयातील २००४-०५ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
May 8, 2025, 14:32 IST
अंचरवाडी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "शाळा सुटली, पण आठवणींनी सोडलं नाही..." हेच प्रत्यक्षात उतरले २००४-०५ च्या दहावी बॅचच्या स्नेहमेळाव्यात! ३ मे २०२५ रोजी अंचरवाडी येथील श्री शिवाजी विद्यालयात २० वर्षांनंतर एकमेकांना भेटण्यासाठी, आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि शाळेच्या पायऱ्यांवर पुन्हा एकदा पाऊल ठेवण्यासाठी ३५ जुन्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली.
कार्यक्रमात माजी व विद्यमान शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गजानन जाधव सर अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुण्यांमध्ये रिंढे सर, शरद परिहार सर, यशवंत खाकरे सर, लक्ष्मण परिहार सर यांच्यासह अन्य शिक्षकांचा सहभाग होता.विद्यार्थ्यांमधून राहुल परिहार, रामेश्वर साळोक, योगेश परिहार, कविता जाधव, मुक्ता सुरडकर आदींनी आपल्या आठवणी शेअर केल्या. शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत, त्या काळातील किस्से, शाळेचे दिवस आणि विद्यार्थ्यांची प्रगती यावर भर दिला.
Related img.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जुन्या दिवसांची आठवण दिसत होती. काहींच्या डोळ्यात नकळत अश्रू तर काहींनी एकमेकांना घट्ट मिठी मारत बालपण परत अनुभवले.
कार्यक्रमानंतर एकत्र भोजनाचा आनंद घेत, 'परत भेटूच' अशी वचनबद्धता घेत कार्यक्रमाचा समारोप झाला.
या स्नेहमेळाव्यामुळे केवळ आठवणींना उजाळा मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्यही जागृत झाले. अशा कार्यक्रमांची परंपरा पुढे सुरू रहावी, ही एकमुखी इच्छा सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.