नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस! अद्यापही गोंधळ कायम; चिखलीचा तिढा सुटता सुटेना; चिखली काँग्रेसचा निर्णय दुपारी पावणेतीनला होणार;

बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसकडून सावध पवित्रा!  बुलढाण्यात भाजप आणि शिंदे सेनेचा उमेदवार कोण? 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज १७ नोव्हेंबरला शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असला तरी जिल्ह्यातील प्रमुख नगरपालिका समजल्या जाणाऱ्या चिखली आणि बुलढाण्यात महायुतीचा गुंता सुटायला तयार नाही. राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या चिखलीत भाजपचा उमेदवार कोण? या प्रश्नाचे उत्तरही वृत्तही पर्यंत समोर आले नव्हते. चिखली काँग्रेसची देखील तीच परिस्थिती आहे, चिखलीत काँग्रेसच्या दोन्ही इच्छुकांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेले आहेत..मात्र बंडखोरी टाळण्यासाठी दोघांपैकी कुणाला एबी फॉर्म द्यायचा याचा निर्णय दुपारी पावणेतीनला होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात ११ नगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. देऊळगावराजा आणि सिंदखेडराजात  शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शशिकांत खेडेकर आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते डॉ.राजेंद्र शिंगणे एकत्रित येत नगर विकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आ.मनोज कायदेंना शह देण्यासाठी हा "सामाजिक" निर्णय घेण्यात येत असल्याचे सूत्रांकडून कळाले. बुलढाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून दत्ता काकस यांच्या पत्नी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दुसरीकडे त्यांच्या विरोधात कोण? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. आ.संजय गायकवाड यांच्याकडून नगरसेवक पदासाठी बहुतांशजणांनी अर्ज दाखल केलेले असले तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फायनल नसल्याचे ते स्वतः सांगत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी बुलढाणा नगरपालिकेत स्वबळाचा  नारा दिला आहे..मात्र अद्याप त्यांनी त्यांचे पत्ते उघडले नाही..

त्यामुळे बुलढाण्यात भाजप कडून नगराध्यक्ष पदाची दावेदारी कोण करणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. मेहकर आणि लोणार मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता आहे..मात्र मेहकर येथे काँग्रेस स्वबळावर  लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.. महायुतीकडून एकत्रित लढण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.. उमेदवार कोण असतील हे देखील ठरलेले नाही... एकंदरीत जिकडे तिकडे गोंधळ गोंधळ आणि संभ्रम कायम आहे.. दुपारी तीन नंतरच  चित्र स्पष्ट होईल...