स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार! – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे स्पष्ट संकेत

 

 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले असून राजकीय वातावरण तापत चालले आहे. सर्वच पक्ष व इच्छुकांनी मैदानात तयारीला सुरुवात केली असताना, या निवडणुका युतीतून लढाव्यात की स्वतंत्रपणे – यावर चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देणारे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते ना. प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत.

बुलडाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलताना ना. जाधव म्हणाले, “गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व निवडणुका महायुती एकत्रितपणेच लढणार आहे. महायुती ही एकसंघ आहे आणि तीच ताकद आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून येईल.”
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका लढवल्या जातील. लोकसभेत आम्हाला मोठा विजय मिळाला, विधानसभेत विक्रमी बहुमत मिळवले आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच झेंडा फडकेल.”
या विधानानंतर जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या राजकारणात महायुतीकडून एकसंघ रणनीती आखली जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या गणितांवर याचा मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
महायुतीचे हे स्पष्ट संकेत दिल्याने जिल्हा राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता असून, आगामी काळात उमेदवार निवड व जागावाटपावर लक्ष केंद्रित होणार आहे.