संदीप शेळकेंची वाढती लोकप्रियता प्रस्थापितांसाठी अडचणीची ठरण्याची चिन्हे! कारणंही तशीच आहेत..! बुलडाणा लोकसभा निवडणुक ठरणार लक्षवेधी...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुका आता अगदी तोंडावर आल्यात..कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. एप्रिलच्या मध्यापर्यंत कदाचित मतदान झालेले असू शकते..त्यामुळे आता संभाव्य उमेदवार तयारीला लागलेत..बुलडाणा लोकसभा मतदारसंघात यावेळी होणारी लढत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत..अनेक संभाव्य उमेदवार निवडणुकीची तयारी करीत असले तरी अद्याप कुठलेही राजकीय लेबल लागलेले नसतांना देखील राजर्षी शाहू मल्टीस्टेट चे संस्थापक तथा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी निवडणूकपूर्व तयारीत चांगलीच आघाडी घेतल्याचे विरोधक देखील मान्य करीत आहेत ..अलीकडच्या ५ -६ महिन्यांत त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला, संवाद यात्रा काढली..रिकाम्या आरोप प्रत्यारोपांच्या भानगडीत न पडता ते विकासाच्या मुद्द्याच बोलत राहिले त्यामुळे त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. संदीप शेळकेंची ही वाढती लोकप्रियता आगामी लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित पुढाऱ्यांच्या चांगलीच अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत..
 बुलडाणा लोकसभा मतदारसंघात सध्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार आहेत. तीनदा आमदारकी आणि तीनदा खासदारकीचा उपभोग घेणाऱ्या खा. जाधवांसमोर यंदा अनेक आव्हाने आहेत. भाजपचा अंतर्गत सर्व्हे देखील त्यांच्यासाठी अनुकूल नसल्याचे खुद्द आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. तर असो..मुद्दा आहे तो संदीप शेळकेंच्या लोकप्रियतेचा...मुळात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरण्याआधीच संदीप शेळके यांचा सहकार क्षेत्रातील वावर मोठा होताच. राजर्षी शाहू परिवार, धनिक मायक्रोफायनान्स यासह विविध संस्थांच्या माध्यमातून ते घराघरात पोहचले होतेच. हाती सत्ता नसली तरी आपल्याकडे काय नाही यापेक्षा जे आहे त्यातून जे जे चांगले करता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला. ४० हजार महिलांना कर्जपुरवठा करून महिलांना स्वावलंबी करण्याचे काम त्यांनी केले. याशिवाय सुशिक्षित बेरोजगार आणि विविध कौशल्य अंगी असलेल्या तरुणांना देखील रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 
ते धडपडत राहिले.जिल्हापातळीवरील कुठल्या राजकीय नेत्याला हाती सत्ता असताना जे जमले नाही ते सहकार आणि लोकसहभागातून त्यांनी करून दाखवले..आता याचा परिणाम व्हायचा तोच होतोय. संदीप शेळके यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.
वन बुलडाणा मिशनची संकल्पना...
खरं तर सध्याच्या राजकारणात सोबतीला राजकीय पक्ष असल्याशिवाय काही खरे नाही अशी मानसिकता..मात्र संदीप शेळके त्याला अपवाद ठरलेत. आतापर्यंत राजकीय पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध करणे पाहण्यात आले मात्र संदीप शेळके यांनी "जनतेचा जाहीरनामा" ही अनोखी संकल्पना मांडली. बुलडाणा जिल्ह्याचा विकास हा एकमेव अजेंडा ठरवून वन बुलडाणा मिशन ही राजकीय लोकचळवळ उभी केली. बुलडाणा जिल्ह्याचे मागासलेपण दुर करण्यासाठी काय काय करता येईल यावर स्वतःचेच टूमने न वाजवता जनतेच्या सुचना मागवल्या. सिने अभिनेते भरत गणेशपुरे यांनी संदीप शेळकेंची मुलखात देखील जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. आरोप प्रत्यारोप न करता, एकमेकांची उणी - दुणी न काढता देखील विकासाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आणता येऊ शकते हे संदीप शेळकेंनी दाखवून दिले. बुलडाणा जिल्ह्याचा इतिहास गौरवशाली आहे, जगाला हेवा वाटावा असा भौगोलिक वारसा आहे, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली धार्मिक स्थळे जिल्ह्यात आहेत तरीही जिल्ह्याची ओळख मागासलेला जिल्हा का? असा संदीप शेळकेंचा सवाल योग्यच आहे आणि लोकांना देखील तो पटल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात संत्रा प्रकिया उद्योग, केळी प्रक्रिया उद्योग, महिलांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर अशा अनेक मुद्द्याच्या गोष्टी संदीप शेळके करीत आहेत, त्यामुळे रिकामी भाषणबाजी करण्यापेक्षा मुद्द्याच बोलणाऱ्या संदीप शेळकेंची लोकप्रियता वाढत आहे..
 प्रस्थापितांसमोर आव्हान...
पारंपारिक राजकारणापेक्षा राजकारणाची नवी पद्धत संदीप शेळकेंनी जिल्ह्यात सुरू केली आहे. सध्या ते कुठल्याही राजकीय पक्षात नसले तरी लोकसभा निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन त्यांनी केले आहेत. १२०० पेक्षा अधिक गावात बूथ बांधणीचे काम देखील त्यांनी पूर्ण केले आहे. त्यामुळे एवढी तयारी असलेल्या संदीप शेळकेंवर राजकीय पक्षांच्याही नजरा आहेत. पुढे काय चित्र असेल हे सध्या अस्पष्ट असले तरी अपक्ष उमेदवार म्हणून देखील संदीप शेळके यांनी प्रस्थापित राजकीय नेत्यांसमोर चांगलेच मोठे आव्हान निर्माण केले आहे.