अन्यथा रक्ताचे पाट वाहतील! रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला गंभीर इशारा;म्हणाले, भक्ती मार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करून , त्यांचे संसार उघड्यावर आणु नका...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सिंदखेडराजा ते शेगाव या प्रस्तावित भक्तीमार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गावरील ४५ गावातील शेतकऱ्यांनी या मार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन होणार आहे, आधीच समृद्धी महामार्गामुळे मोठया प्रमाणात शेतकरी भूमिहीन झाले आहे. कोणाचीही मागणी नसतांना शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा या मार्गाचा अट्टाहास का ? असा प्रश्न उपस्थित करत विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याचे संसार उघड्यावर आणू नका, शेतकऱ्यांना भूमिहीन होण्यापासून वाचविण्यासाठी हा मार्ग रद्द करा, अशी मागणी रविकांत तुपकरांनी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तर शेतकऱ्यांच्या आंदोलनात आम्ही आक्रमकपणे सहभागी असून जबरदस्ती शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याल तर रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.
 
Advt.👆
 रविकांत तुपकरांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते शेगाव असा भक्तिमार्ग प्रस्तावित असून, १०९ की.मी.चा हा मार्ग असून जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव व शेगाव तालुक्यातून हा मार्ग जाणार आहे. परंतु या मार्गावरील ४५ गावातील गावकरी व शेतकऱ्यांनी या मार्गाला विरोध दर्शविला आहे. तातडीने हा मार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी आंदोलने ही सुरु झाली आहे. वास्तविक पाहता सिंदखेडराजा ते शेगाव हे अंतर अंदाजे २४० की.मी. आहे. सिंदखेडराजा ते मेहकर समृद्धी महामार्गाचा उपयोग करून मेहकर एन्टरचेंज पासून शेगाव केवळ ३ तासात पोहचता येते. तसेच सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव, शेगाव हा पर्यायी मार्ग देखील उपलब्ध आहे. त्यामुळे भक्तीमार्गाची कुठल्याही प्रकारे कोणाचीही मागणी नाही. वास्तविक भक्ती महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी अदिग्रहित होणार आहेत. त्याचबरोबर अनेकांचे पक्के घर, विहिरी सुद्धा जाणार आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे. तसेच अनेक जन बेघर होणार आहेत. आधीच समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन झाला आहे. त्यातच आता हा भक्तिमार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या भक्ती मार्गाला तीव्र विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या भावनांशी आम्हीही सहमत आहोत. शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन भक्ती मार्ग उभा करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सदर प्रस्तावित भक्तीमार्ग तातडीने रद्द करून शेतकऱ्यांना भूमिहीन होण्यापासून वाचवावे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा असून तातडीने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न झाल्यास आम्ही देखील आक्रमकपणे रस्त्यावर उतरू, जर जबरदस्ती शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याल तर रक्ताचे पाट वाहतील असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.