मातीमोल झाले हिरवे स्वप्न! मदत कशी मिळणार ? पिक विमा तर काढलाच नाही; एनडीआरएफ च्या नियमाने मिळणार मदत...?

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पेरणी तोंडावर रुसलेला पाऊस असा बरसला की मेहकर, लोणार मध्ये सर्वाधिक नुकसान झाले. मातीमध्ये पेरलेले हिरवे स्वप्न मातीमोल झाले. पैनगंगेसह परिसरातील नद्यांचा पूर शेतशिवारातून वाहू लागल्याने सोयाबीन, मूग, उडीद, तूर, हळद ही अंकुरलेली ३९ हजार हेक्टरवरील पिके वाहून गेली. पिक विमा काढलेला नसल्याने आता या शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे मात्र एनडीआरएफच नियमानुसार ही मदत मिळू शकते. संबंधित अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

बुलढाणा काल-परवा पावसाने सर्व दूर हजेरी लावली मात्र घाटावरील मेहकर व लोणारमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. महत्त्वाचे म्हणजे एकट्या जून महिन्यात जवळपास ३० महसूल मंडळांच्या वर भागात हेवी रेनची नोंद यंत्रणेने घेतली आहे. मेहकर भागात पैनगंगेला पूर आल्याने अनेकांची शेती वाहून गेली तर कॅनॉल फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या भागात सुरुवातीपासूनच पावसाने चांगली हजेरी लावली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिले होते. जवळपास पिकं देखील अंकुरली होती. मात्र काल परवाच्या पावसाने या पिकांचे प्रचंड नुकसान केले.

 सिंदखेड राजा तालुक्यातील १२ गावांमधील १८० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाले. लोणार तालुक्यातील ३५ गावांमध्ये १५० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनची हानी झाली. पिक विमा काढायला अद्याप सुरुवात झालेली नाही त्यामुळे या पिकांची हानी झालेल्या नंतर मदत कशी मिळणार हा प्रश्न सामान्यना पडला आहे. एनडीआरएफ च्या निकषानुसार या शेतकऱ्यांना मदत दिली जाऊ शकते. 
काय म्हणाले अधिकारी....
मेहकर लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. पंचनाम्यानंतर प्रस्ताव शासनाकडे पाठवल्या जाईल. शासनाच्या नियमानुसार NDRF च्या निकषानुसार मदत केली जाईल.– डॉ.किरण पाटील ,जिल्हाधिकारी