EXCLUSIVE स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपकडून तरुणांना मोठी संधी! ४५ वर्षांखालील उमेदवारांना प्राधान्य! "हे" आहे महत्वाचे कारण...
Jun 20, 2025, 09:06 IST
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क ): राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच भारतीय जनता पक्षाने (भाजप) यंदाच्या निवडणुकीत एक वेगळा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पक्षाने ४५ वर्षांखालील तरुण उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्धार केला असून, बहुतेक जागांवर तरुण चेहरे रिंगणात उतरविण्यात येणार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हानिहाय बैठका व आढावा सुरू असून, संघटनात्मक बांधणीला गती देण्यात येत आहे. या बैठकींतूनच निवडणुकीसंदर्भातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यात तरुणांना संधी देण्याचा मुद्दा ठळक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. या व्यापक उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता घडवण्याची प्रक्रिया भाजपकडून राबवली जात आहे. आगामी ३० ते ४० वर्षे पक्षासाठी सक्रिय राहतील, असे सक्षम कार्यकर्ते तयार करण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. त्यामुळेच तरुण पिढीला संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि निवडणूक रिंगणातील संधी देण्यावर भर दिला जात आहे.
या नव्या योजनेनुसार, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शकाची भूमिका बजावावी लागणार असून, तरुण उमेदवारांना यशस्वी करून आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. "प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" ही भाजपची विचारधारा असून, त्यानुसार राष्ट्रनिर्माणासाठी सज्ज कार्यकर्ता घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका केवळ सत्तेची चढाओढ न राहता, भाजपसाठी कार्यकर्ता निर्माणाची संधी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत या निर्णयातून मिळाले आहेत.