उंद्रीचे होणार आता "उदयनगर"! आमदार श्र्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांना यश

 
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली तालुक्यातील उंद्री  गावाचे नामकरण उदयनगर करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आमदार श्र्वेताताई महाले पाटील यांनी लावून धरली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने परवानगी दिल्याने लवकरच उंद्री  चे आता उदयनगर होणार आहे. त्यामुळे आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने उदयनगर ग्रामस्थांनी आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे आभार मानले आहेत.

आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी गेल्या महिन्यात दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन उंद्रीचे उदयनगर करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणतीही हरकत नसल्याचे कळवले आहे. या विषयाबाबत महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्धी देण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.

उंद्री हे नाव शिवी दिल्यासारखे वाटायचे त्यामुळे गावाचे नामकरण उदयनगर करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून होत होती.  अखेर आता नामकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.आमदार श्र्वेताताई महाले पाटील यांनी विधानसभेत याबाबत अनेकदा आवाज उठवला होता. उंद्रीचे उदयनगर  नामकरण होत आहे आणि या कार्यात मला खारीचा वाटा उचलता आला हे माझे भाग्य समजते. नामकरणामुळे आता नव्या पर्वाचा उदय झाला असल्याची प्रतिक्रिया आमदार श्र्वेताताई महाले यांनी दिली आहे.