टेंभी हादरले! चौघांनी विष घेतले!!; मायलेकाचा मृत्यू, दोघांची मृत्यूशी झुंज
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चौघांनी विष घेतल्याने मोताळा तालुक्यातील टेंभी गाव हादरले आहे. काल, ४ जुलैच्या रात्री उशिरा ही घटना समोर आली. त्यानंतर मध्यरात्री चौघांनाही उपचारासाठी मलकापूरला हलविण्यात आले. यातील मायलेकाचा रुग्णालयात नेतानाच मृत्यू तर दोघांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
वृषाली समाधान तायडे (३०), अनुभव समाधान तायडे (६) यांचा मृत्यू झाला आहे, तर वैभव समाधान तायडे (१०) आणि एका १७ वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मलकापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, समाधान धोंडू तायडे (३५) हे त्यांचे वडील धोंडू तायडे यांच्यासोबत काल रात्री जेवण आटोपून शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. मध्यरात्री १२ च्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना त्यांची पत्नी वृषाली आणि दोन मुले अनुभव आणि वैभव यांची प्रकृती गंभीर दिसली.
गावातीलच एक अल्पवयीन मुलगाही त्यांच्यासोबत अत्यावस्थेत दिसून आला. त्यांनी लगेच गावातील सरपंच व पोलीस पाटलांना माहिती देऊन चौघांनाही उपचारासाठी मलकापूर येथे हलवले. मात्र हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत वृषाली आणि ६ वर्षांचा चिमुरडा अनुभव यांचा वाटेतच मृत्यू झाला होता. गावातीलच अल्पवयीन मुलगा आणि वैभव समाधान तायडे यांच्यावर मलकापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. विष घेतलेला अल्पवयीन मुलगा तायडे यांच्या घरी कशासाठी आला होता, घटना घडली तेव्हा वृषाली यांची सासू कुठे होती यासह अनेक प्रश्न या घटनेने उपस्थित केले असून, पोलिसांसमोरही तपासाचे आव्हान राहणार आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणात धामणगाव बढे पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल नव्हता.