कर्जाच्या विळख्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; तीन लाखांच्या कर्जाने घेतला जीव..! 

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सततच्या नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्याला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी टाकरखेड हेलगा येथे घडली. गोपाल वसंता बराटे (वय २९) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
 गोपाल बराटे यांनी आपल्या शेतीसाठी एका पतसंस्थेतून सहकर्जदार म्हणून तीन लाख रुपयांचे कर्ज उचलले होते. मात्र, गेल्या काही हंगामांपासून सततची नापिकी आणि वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत काहीही उत्पन्न मिळत नव्हते. त्यातच कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने तो मानसिक नैराश्यात होता.
मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
गोपालच्या वृद्ध आई-वडिलांवर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. कर्जाचा तपशील तलाठ्यांनी तहसीलदारांकडे सादर केला असून सध्या पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुमेरसिंग ठाकूर करत आहेत.