कायदा बदलला म्हणून गुन्हे थोडीच थांबणार? नव्या कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिल्या गुन्ह्याची नोंद मलकापूर पोलीस ठाण्यात;भरधाव वेगाने एकाला चिरडले; आधी लागायचे कलम ३०४, आता लागले...

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज १ जुलै पासून देशात नवीन फौजदारी कायदा लागू झाला. जुना ब्रिटिशकालीन कायदा रद्द करून आता भारतीय न्याय संहिता लागू झाली आहे. त्यानुसार कायद्यात विविध बदल करण्यात आलेत. गुन्हा दाखल करतेवेळी लावण्यात येणाऱ्या कलमांत देखील बदल करण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास आणि निकाल लावण्यासाठी समय मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे वेगवान तपास आणि पिडीत व्यक्तींना लवकर न्याय मिळणार आहे. मात्र कायद्यात बदल झाला म्हणजे गुन्हे थांबतील असे नव्हे, मात्र कठोर आणि शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्यास गुन्ह्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. बुलडाणा जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास कायद्यात बदल झाल्यानंतर आज १ जुलै रोजी जिल्ह्यातील पहिला गुन्हा मलकापूर शहर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला. दुर्दैवाने नव्या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्याची नोंद एका व्यक्तीच्या मृत्यूने झाले..भरधाव वाहनाने चिरडल्याने एकाचा मृत्यू झाला, पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आधीच्या कायद्यानुसार अशा प्रकरणांत कलम ३०४ लावल्या जायचे मात्र आता नव्या कायद्यानुसार २८१,१०६(१) सहकलम १३४,१३८ अशी कलमे लावण्यात आली. हा गुन्हा आज १ जुलैच्या सकाळी १० वाजता नोंदवण्यात आला.