भावकी उठली जीवावर ! आर्थिक वादातून जालना जिल्ह्यातील तरुणाची किडनॅपिंग! बुलडाणा जिल्ह्यात केले मर्डर! मृतदेह फेकला तळेगाव शिवारात....

 
 दुसरबीड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भावकीतील आर्थिक वादातून जालना जिल्ह्यातील तरुणाचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून करून मृतदेह बुलडाणा जिल्ह्यातील तळेगाव शिवारात फेकण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सुरेश तुकाराम आर्दड (वय अंदाजे ३५), रा. कुंभार पिंपळगाव, ता. घनसावंगी, जि. जालना असे मृताचे नाव आहे. रविवारी २९ जूनच्या पहाटेच्या सुमारास तळेगाव शिवारातील एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.
२८ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास सुरेश आर्दड याचे चार जणांनी गावठी पिस्तूल व कुऱ्हाडीचा धाक दाखवून अपहरण केले होते. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यात फेकण्यात आला.
या प्रकरणी सुरेश आर्दड यांचा चुलत भाऊ सुभाष आर्दड यांच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलिस ठाण्यात हरी कल्याण तौर, सखाराम ऊर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (रा. राजाटाकळी), मिनाज बाबामिया सय्यद (रा. कुंभार पिंपळगाव) आणि अज्ञात वाहनचालक यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. ही घटना भावकीतील वैमनस्याचे टोक गाठल्याचे दुर्दैवी उदाहरण ठरते आहे.