गोवंशाची निर्दयीपणे वाहतूक; ५६ बैलासह ३१.४० लाखांचा ऐवज जप्त, पाच आरोपींना अटक; चिखली पोलिसांची मोठी कारवाई...

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  बैलांची कत्तलीसाठी क्रूर व निर्दय पद्धतीने अवैध वाहतूक केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
ही कारवाई २२ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास बुलढाणा–जालना रोडवरील दांडगे लेआउटसमोर, चिखली येथे करण्यात आली. याप्रकरणी ओम मदनराजे गायकवाड (वय २१, व्यवसाय शेती, रा. पळसखेड दौलत, ता. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानुसार,
आरोपी साबीर अहमद अलीम अहमद (रा. खानापूर, ता. नकुलजी सारंगापूर, उत्तर प्रदेश), मुक्तार सुलतान कुरेशी (रा. जामनेर, जि. जळगाव), मोहम्मद अरशर मोहम्मद तय्यब (रा. मालेगाव, जि. नाशिक), शेख असलम शेख कुरेशी (रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर) व ज्ञानेश्वर संतोष सुरडकर (रा. मादणी, ता. सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर) यांनी संगनमत करून दोन आयशर वाहनांमधून गोवंश बैलांची विना परवाना कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केल्याचे उघड झाले आहे.

या कारवाईत पोलिसांनी आयशर वाहन क्र. MH-43 BP-2551 (अंदाजे किंमत ₹10 लाख) मधून २७ गोवंश बैल (किंमत अंदाजे ₹5.40 लाख) व आयशर वाहन क्र. MH-04 GR-0053 (अंदाजे किंमत ₹10 लाख) मधून २९ गोवंश बैल (किंमत अंदाजे ₹6 लाख)असा एकूण ५६  बैलांसह सुमारे ₹31 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम 11(1)(ड), 11(1)(ई), 11(1)(ल), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5(अ), 5(ब), 9, 11, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व आरोपींना अटक करून चिखली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.