लोणार तालुक्यात रेतीच्या टिप्परने घेतला बळी!सुलतानपूर-जालना महामार्गावर भीषण अपघात...
May 27, 2026, 18:23 IST
सुलतानपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):अंजनी खुर्द मार्गावर भानापूरजवळ रेती भरलेल्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गजानन हरिभाऊ मुळे (रा. उदनापूर, ता. लोणार) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक गजानन मुळे हे आपल्या दुचाकीवरून(MH28C A6830) जात असताना, समोरून येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या रेती वाहक(MH28B B8302) टिप्परने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, गजानन मुळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तणावाचे वातावरण आणि पोलिसांची कारवाई
अपघाताची माहिती मिळताच परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रसंगावधान राखून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत केली. यावेळी डीवायएसपी संतोष खाडे साहेब,आलेवार साहेब, लक्ष्मण कटक सर, नागरे साहेब आणि केदार साहेब यांच्यासह पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुलतानपूर येथील प्रतिष्ठान नागरिक शेख खाजा शेख उमर व शेख खाजा शेख अख्तर यांनीसुद्धा सहकार्य केले.
अपघातांची मालिका सुरूच
या महामार्गावर गेल्या महिन्याभरापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांतील सुलतानपूर ते अंजनी खुर्द दरम्यानची ही दुसरी मोठी अपघाती घटना आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, संबंधित प्रशासनाने या रस्त्यावरील वाहतुकीबाबत आणि सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.