‘सर कटी लाश’ प्रकरणाचा तपास मेहकरच्या SDPO संतोष खाडेंकडे; शिवानी जिवंत निघाल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान...

 
बुलढाणा, (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात सापडलेल्या धड व मुंडके वेगळे केलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असताना, या तपासाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. ज्या महिलेची ओळख शिवानी कलमेकर म्हणून निश्चित करून तिच्या हत्येप्रकरणी वडील आणि भावाला अटक करण्यात आली होती, तीच शिवानी जिवंत असल्याचे समोर आल्याने पोलिसांचा संपूर्ण तपासच प्रश्नचिन्हाखाली आला आहे. या पार्श्वभूमीवर आता हा संवेदनशील आणि गुंतागुंतीचा तपास मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) संतोष खाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
राजुरा शिवारात २६ एप्रिल रोजी एका महिलेचे धड आणि मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत १० मे रोजी मध्य प्रदेशातून दोन आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आल्याचा दावा करत मृत महिलेची ओळख शिवानी कलमेकर अशी असल्याचे जाहीर केले होते.

मात्र, २६ मे रोजी या प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. कथित मृतक शिवानी कलमेकर ही मध्य प्रदेश पोलिसांसमोर प्रत्यक्ष हजर झाली. त्यामुळे पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटी उघड झाल्या. शिवानीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले तिचे वडील बापूराम कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांची तुरुंगातून सुटका करावी लागली.

या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेची मोठी नाचक्की झाली असून, जबाबदारी निश्चित करत दोन पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक (PSI) आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्र, यामुळे मूळ प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. राजुरा शिवारात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा होता आणि त्या महिलेची हत्या कोणी व का केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

 तपासासमोर अनेक अनुत्तरित प्रश्न

या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर SDPO संतोष खाडे यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. घटनास्थळापासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशची सीमा असल्याने तपासाची व्याप्ती दोन राज्यांपर्यंत पोहोचली आहे. मृत महिला मध्य प्रदेशातील आहे की इतर कोणत्या भागातील, याचा शोध घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.

तसेच, मृतदेहाची ओळख लपविण्यासाठी मुंडके आणि धड वेगळे करण्यात आले का, मृतदेह मध्य प्रदेशातून आणून येथे टाकण्यात आला की हत्या याच परिसरात झाली, याचाही तपास करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केलेल्या संशयितांचा या हत्येशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याचाही फेरतपास होण्याची शक्यता आहे.

 राज्याचे लक्ष ‘सर कटी लाश’ प्रकरणाकडे

शिवानी कलमेकर जिवंत असल्याचे उघड झाल्यानंतर ‘सर कटी लाश’ प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. पोलिसांनी मृतदेहाची ओळख निश्चित करताना कोणत्या पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, या गूढ हत्येचा खरा उलगडा करून मृत महिलेची ओळख पटविणे आणि वास्तविक आरोपींपर्यंत पोहोचणे, हेच आता तपास यंत्रणेसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.